पुणे : वारजे येथील ‘श्री प्रल्हादराव काशिद फाउंडेशन’च्या मातोश्री नॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मुळशी येथे भात लावणीचा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांनी नुकतीच कातवडी गावाला भेट दिली आणि तेथील भातशेतीत स्वतः भात लावणी केली. या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून मुलांना ग्रामीण भागातील लोकांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान जवळून अनुभवास मिळाले. वेगवेगळी धान्ये, पिके, ती पिकवण्यासाठी लागणारे हवामान इत्यादीबाबत सविस्तर माहिती घेता आली. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे ज्ञान मुलांसाठी उपयुक्त ठरते, या जाणीवेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचे विश्वस्त धनंजय काशिद, शिक्षिका प्रीती खर्जे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. वैभव उभे, वैशाली ताकवले व ऐश्वर्या खाडे हे शिक्षकही यात सहभागी झाले होते.